प्रस्थान उर्फ exit

दोन विचारधारेचे अनोखे समन्वय

मकरंद साठे लिखित आणि आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘प्रस्थान ऊर्फ EXIT’ हे कोविडकाळानंतरचे साठेंचे पहिले नाटक आहे. नाटकात आलोकच्या दिग्दर्शनाखालील पात्रांची तगमग, सुप्त इच्छा, तुटलेपणाच्या व दडलेल्या भावना प्रकट होताना दिसतात. या नाटकात दोन कलाकारांचेच नाही, तर दोन पिढ्यांच्या विचारांचे अनोखे समन्वय पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि त्या निमित्ताने सतत एकमेकांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या दोन व्यक्तींच्या पार्श्वभूमीसोबत हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येते. यातील वृद्ध पुरुष केवळ फॅसिझमच जगाला वाचवू शकते, या तटस्थ मताचे रेल्वेतून निवृत्त झालेले एक अधिकारी आहेत. तर, त्यांची पत्नी ही शिकलेली, वाचनाची आवड व राजकीय विचारधारांचा अभ्यास असलेली, डाव्या विचारांची मध्यमवर्गीय गृहिणी आहे. दोन वयोवृद्धांबरोबर असलेले तिसरे पात्र म्हणजे यमदूत, जे नाटकाला विडंबनात्मक रूप देते.

गजानन परांजपे आणि सुहिता थत्ते यांनी साकारलेले हे वृद्ध जोडपे इंटरेस्टिंग वाटतात. दोघांपैकी एक जण मृत्यू पावलेला असला तरी ती व्यक्ती नेमकी कोण? याबद्दल संभ्रम आहे. कारण, मेलेली व्यक्ती आणि यमदूताच्या ऍपवर येणाऱ्या मेलेल्या व्यक्तीचे नाव वेगवेगळे आहे. यातून सुरू होणारा खेळ ट्रॅजिक वाटतो. त्यातून उलगडणारा आशय मग राजकारण, समाजकारण, अस्तित्व आणि मृत्यू अशा अनेक गोष्टींना भिडतो. मानवी जीवनातील निरनिराळ्या घटकांचा जसे की जीवन-मृत्यू, एकाकीपणाचे दुःख आणि ‘दुसऱ्या’ कोणासोबत राहण्यातून येणारी बंधने, नरक म्हणजे इतर लोक, स्वातंत्र्य, नंतर त्याचेही ओझे वाटणे या गोष्टी नाटकात दिसतात. शिवाय, रोज दिसणाऱ्या अनेक गोष्टी मार्मिकपणे मांडलेल्या दिसतात. डाव्या विचारसरणीच्या मांडणीतील चतुरपणा, जसे की चर्चिल सोईस्कर वाटणे, ‘आता नवीन तंत्रज्ञान आम्हाला शिकायचे नाही, आमची वृद्धांची पिढी सतत शिकतेच आहे’ हा संदर्भ, कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट या दोन्ही बाजूंनी बोलताना दोन्ही बाजूंची उणीदुणीही काढताना पात्र दिसतात.

स्वतःचे मनोबल वाढवण्यासाठी हिटलरचे भाषण वाचणारे आजोबा आणि बिअरचा घोट घेत ६०च्या दशकातील संगीतावर नाचून दमल्यावर थकवा दूर करण्यासाठी चर्चिलचे भाषण वाचणारी आजी प्रेक्षकांना टिकवून ठेवतात. माणसांमध्ये वाढत चाललेला इगो आणि त्यातून निर्माण होणारी तेढ उत्तम उभी केलेली दिसते. वेळ घालवण्यासाठी काय करावे या गूढात अडकलेले हे वृध्ददाम्पत्य या नाटकात एकमेकांबद्दल अगदी टोकाच्या गोष्टी प्रेक्षकांना सांगतात आणि नंतर हा आमचा वेळ घालवायचा उपाय असल्याचे दाखवत हे नाटक येऊन पोहचते. शेवटी माणसाला पडणारे प्रश्न, वेळ, परिस्थिती सर्व काही बदलत असते. पण, अटळ असतो तो मृत्यूच! आणि म्हणून जोडप्यातील एकाच्या मृत्यूने नाटकाचे exit होते.

‘ती’चा स्वातंत्र्यलढा

रात्री उशिरापर्यंत ‘नदी का पहाड’ खेळून मी सकाळी नऊ वाजता आई ओरडल्यावर उठले आणि शाळेत जाण्यासाठी आवरायला लागले. आंघोळीला गेले आणि माझ्या कपड्यांवर रक्त लागलंय हे बघून प्रचंड घाबरले. आरडा-ओरडा करू लागले. आजी पटकन उठून माझ्याजवळ आली. आईने काय झालंय म्हणून विचारलं पण, आजीने तिला जवळ आल्यावर हळूच सांगितलं, “तिला पाळी आलीय!”

सुरुवातीला, ‘ती बाहेरून झालीय’, ‘तिचं डोकं मळलय’ असे शब्द ऐकले की माझ्या प्रश्नांचा भडिमार आईवर सुरू व्हायचा. आई बाहेरून झालीय म्हणजे काय? मी तर कालच केस धुतले, पण तरी माझं डोकं मळलय असं आजी का बोलली? आता माझं रोज डोकं मळणार का? आता पाळी रोज येणार का ? माझं रोज रक्त वाहणार का ? अशा अनेक प्रश्नांचा गुंता माझ्या मनात होत असे.

आजी, आई आणि काकूने माझे खेळणे, मोठ्याने हसणे, धावणे-पळणे बंद केले. जुन्या बाजारातून आणलेला माझा आवडता फ्रॉक घालायच बंद करून माझ्या अंगावर ओढणीचा पंजाबी ड्रेस चढवून, “आता मी मोठी झालीय” असे त्यांनी मनोमन ठरवून माझ्यावर थोपवले. पाळीदरम्यान बसण्यासाठी घरातला कोपरा ठरला. पाचव्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायची मगच सर्व वस्तूंना स्पर्श करायचा, असे बजावण्यात आले.

आधी दर गुरुवारी काकूचा उपवास असायचा. तिला वाचता येत नसल्याने ती मला देवीची पोथी (कथा) वाचायला बसवायची. पण, पाळी आल्यावर पोथीला हाथ लावायचे नाही, असे आजीने बजावले होते. मग मला प्रश्न पडायचा, ”पाळी आल्यावर पोथीला हाथ लावायचा नाही मग, शाळेतल्या विज्ञान, गणिताच्या पुस्तकांना हाथ लावलेला चालतो का ? आणि नसेल चालत तर पाळीचे पाच दिवस माझा अभ्यास कसा होणार ? दर महिन्याला पाच दिवस शाळा बुडाली तर मी मोठी व्यक्ती कशी बनणार ?”

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे कुरडया, पापडांचा सिझन. काकू म्हणायची की, पापडांसाठी भिजत घातलेल्या धान्यावर पाळी आलेल्या बाईची सावली पडली. तर, पापड नीट बनत नाहीत, त्यांचा रंग बदलतो. कारण ते सणाला देवापुढे ठेवले जाते. हे कितपत खरे असते हे पडताळून बघण्याची मला संधी मिळाली. शाळेतून येतांना गल्लीत एक बाई पापड कुरडया सुकत असलेले खाट पलीकडून पकड म्हटली आणि मी खाटीला हाथ लावणार तितक्यात तिने विचारले, “तू बाहेरून तर नाहीय ना ?” मी मुद्दाम “नाहीतर !” असे बोलली आणि पापडांना स्पर्श केला. दुसऱ्या दिवशी तीच बाई गल्लीभर बायकांना दाखवत होती की बघा, “माझे पापड कसले भारी बनलेत.”

सुरुवातीला पाळी दरम्यान घरात अगरबत्ती लावली की, देवाला चालत नाही म्हणून आई ओरडायची पण, माझा प्रश्न तयारच असायचा, “देवाला जन्म देणारी एक बाईच असेल ना? देवाला पण आई असेलच ना?”, असे प्रश्न विचारल्यावर बाईच्या जातीने एवढं बोलायचं नसतं म्हणून मी घरातल्या बायकांकडूनच शिव्या ऐकायची. पण, माझे प्रश्न कधी थांबायचे नाही.

इयत्ता सातवीच्या वर्गात असतांना शाळेत नरेंद्र दाभोळकरांचे “आपल्याला प्रश्न का पडत नाही ?” या विषयावर व्याख्यान झाले होते. पण, नुसतेच प्रश्न पडून पण काय होणार ना. मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसायची. कारण, कदाचित माझ्या सभोवतालच्या महिलांपर्यंत 13व्या शतकात मासिक पाळी वर निर्भीडपणे अभंग रचणाऱ्या, 700 वर्षांपूर्वी सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना घट्ट असताना कोणी देहाच्या विटाळा बद्दल ”ब्र” काढायचा विचार ही करत नव्हता. त्या काळी बंड करून आपल्या अभंगांच्या माध्यमातून “देहात विटाळ असतो मग, देह कोणी निर्माण केला ?” असे प्रश्न विचारणाऱ्या संत सोयराबाई पोहचल्याच नाही. घरात व्यक्त व्हायला मिळत नाही म्हणून मी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे विषय मुद्दाम स्त्री स्वातंत्र्याशी निगडित निवडत असे आणि जिंकतही असे.

मी अकरावीत असतांना कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक संमेलनात आई बाबांना माझ्यासोबत पारितोषिक स्वीकारायला बोलावले. पारितोषिक वितरणानंतर ते शिक्षकांना भेटले, त्यांना सर म्हणाले, वर्गातल्या इतर मुलींपेक्षा एखाद्या विषयाकडे बघण्याचा हिचा दृष्टिकोन फार वेगळा असतो. संवादातून, प्रश्नांमधून ती समोरच्याला विचार करायला भाग पाडते. मंचावर बक्षीस घेतांना सूत्रसंचालक माझ्या वर्षभरातील शैक्षणिक गुणवत्तेबद्दल बोलत होते. इयत्ता अकरावी ते TYBA पर्यंतच्या पाच वार्षिक बक्षीस वितरण समारंभातून मला फक्त स्मृतिचिन्हे मिळाली नाही तर, मला आई बाबांचा सपोर्ट मिळत गेला. त्यांचे विश्वास संपादन करता आले, त्यांचा अभिमान बनता आले, त्यांना सन्मानाने वागवता आले. नंतर सरावादरम्यान बाबा माझी प्रत्येक भाषण आवर्जून ऐकायचा आणि मी मुद्दाम स्री संबंधीत निवडलेल्या विषयांवर आमची चर्चा व्हायची. मग, बाबा, भाऊ, मित्र-मैत्रिणी आम्ही खुल्यापणे बोलू लागलो. पाळी का येते ? त्या दरम्यान बाईला काय त्रास होतो ? अशा अनेक विषयांवर चर्चा होऊ लागली.

एकदा पूर्ण कुटुंब शिर्डीला गेलेलो असतांना मला प्रवासादरम्यान पाळी आली. तेव्हा काकू आणि आजी मला वाळीत टाकल्यागत लांब लांब राहायला लागल्या. तू मंदिरात यायचे नाही, म्हणून बजावले. पण, तेव्हा बाबा माझा हात धरून मला मंदिरात घेऊन गेला आणि घरातील महिला वर्गाला समजावून सांगू लागला की, हे फार नैसर्गिक आहे तुम्हीच मुलांना म्हणतात ना, आपल्याला देवाने बनवलय मग देवाला पाळी आलेली बाई चाललीच नसती तर, तसा घटक त्यांनी तिच्यात निर्माण केलाच नसता.

ग्रामीण भागात आजही अशा विषयांवर मोकळ्यापणे बोलण्याचा प्रयत्न केला तर बायका “निर्लज्ज कुठली” असा टॅग लावतात. बाई ही समाजाची जननी असते. पुरुषाइतकाच तिलाही जगण्याचा अधिकार असतो. तिच्या योनीतुन पाच दिवस रक्त येणे म्हणजे ती अपवित्र नाही. ती ‘ती’ आहे म्हणून कोणाची गुलाम किंवा बांधील नाही. ती लोपामुद्रा, ती गार्गी, ती मैत्रेयी तर, मध्ययुगातील स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ ‘ती’ आहे, महाराणी ताराबाई, रझिया सुलतान, चांदबीबी ‘ती’ आहे, आधुनिक भारताच्या इतिहासातील उत्तम प्रशासक अहिल्याबाई होळकर, ब्रिटिशांच्या हाती न लागलेली रणरागिणी राणी लक्ष्मीबाई, स्त्री शिक्षणासाठी लढणारी सावीञीबाई फुले सुद्धा ‘ती’ आहे. कित्येक हाडे तुटल्यानंतर होणारा त्रास सहन करत बाळाला जन्म देणारी ‘ती’ आहे, अल्पवयीन असतांना स्वतःवर बलात्कार झाला म्हणून बलात्कार पीडित महिलांसाठी हैदराबादला प्रज्वला नावाची संस्था उभारणारी ‘ती’ आहे, निराधाराची माय होणारी ‘ती’ आहे, अमेरिकेच्या राजकारणात उपाध्यक्ष पदावर झळकणारी ‘ती’ आहे, देशातील पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती ‘ती’ आहे, नाशिकच्या इगतपुरीतील त्र्यंबक देवगाव येथील आश्रम शाळेत शिक्षकांनी पाळी दरम्यान झाड लावू नये अन्यथा ते जळतं असे बजावल्यावर या अंधश्रद्धेविरुद्ध लढत शिक्षकांची तक्रार दाखल करणारी सुद्धा ‘ती’ आहे. अहो इतकंच काय, आपल्या शेतकरी पतीने दुष्काळात आत्महत्या केली म्हणून कर्जाचा भला मोठा डोंगर आपल्या छातीवर ठेवत संसार लोटत नेणारी सुद्धा ‘ती’ आहे….होय ती एक ‘स्त्री’ आहे!

पण तिच्या मासिक पाळीच्या मानसिक गुलामगिरीतुन पूर्णपणे ती कधी मुक्त होणार ? बऱ्याच लोकांना आजही पाळी आलेल्या बाईचा स्पर्श ही चालत नाही. अरे, तिच्याच रक्त मासातून जन्म घेऊन, तिच्याच उदरात नऊ महिने राहून, तिचीच पाळी नकोशी ? एक बाई मला म्हणाली होती की, ग्रामीण भागात एका समाजात आजही स्त्रियांना प्रसूतीनंतर किंवा पाळी दरम्यान घराच्या बाहेर ठेवले जाते. त्यापेक्षा आपले तर बरेच आहे ना ! म्हणजे ते लोक या गोष्टी स्वीकारत नाही म्हणून आपण जेवढे स्वीकारतोय तेवढे खूप झाले, असे समजून बदलासाठी पुढचा पाऊल टाकणेच आपण बंद करतो.

आज ही ग्रामीण आणि शहरी भागातसुद्धा menstrual cup ने Virginity लॉस्ट व्हायचा धोका असतो, अशी समजूत असल्यामुळे मुली ते वापरतच नाही. काही वर्षांपूर्वी लोकमत वृत्तपत्रात एक बातमी होती. सातपुड्याच्या सत्रासेन भागातील एका आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची ती घटना होती. आदिवासी पाड्यावरच्या त्या बाईने पाळीदरम्यान जुना ब्लाऊस वापरला. त्या ब्लाऊस ला हुक होते, त्या हुकांवर गंज चढला होता आणि तसाच तो कापड तिने वापरल्यामुळे तिला धनुर्वाद झाला आणि तिचा मृत्यू झाला. हे का झालं? कारण ती तिच्या मासिक पाळीच्या आरोग्याबद्दल अनभिज्ञ होती.

आसामच्या काही भागात आजही मुलींना पाळी यायला सुरूवात झाली की, त्यांना शाळेत पाठवणे बंद केले जाते. शिक्षण बंद झाले म्हणजे तिचा मानसिक, सामाजिक विकास खुंटतो, काही वर्षानंतर तुम्ही त्या मुलीला एखाद्या निर्णयाबद्दल विचारले की, तुझी काय इच्छा आहे, तुला काय वाटतय तर ती प्रश्नात पडते, “मला कसली इच्छा असणार ?” तिला वैचारिक स्वातंत्र्य म्हणजे काय ? हे देखील कळणार नाही म्ह्णून तिने स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्व-स्वातंत्र्यासाठी बंड करणे गरजेचे वाटते. तिच्या प्रश्नांना, “बाईच्या जातीने एवढं बोलायचं नसत” असे सांगून तुम्ही तिचा आवाज अजून किती दिवस बंद करणार? पुरुषसत्ताक मानसिकतेने बनवलेल्या so called चौकटीत तुम्ही तिला अडकवू शकत नाही. परंपरेच्या नावाखाली तिच्यावर दडपण न टाकता तिला तिच्या मनाप्रमाणे, तिच्या इच्छेने जगू द्या. तिच्यावर बंधने लादून तिचे स्वातंत्र्य हिरावण्यापेक्षा तिचे निर्णय तिला घेऊ द्या.

प्रश्न मासिक पाळीच्या नावाखाली दडपल्या जाणाऱ्या तिच्या भावना, तीचे स्वातंत्र्य, तीच्या स्वच्छंदी जगण्याचा आहे, काळजी च्या नावाखाली पाच दिवस वाळीत टाकल्याची वागणूक देण्याचा आहे. बदलत्या काळानुसार बद्दललेल्या उपाययोजनांनी आता त्या दिवसात तिने कोपऱ्यात बसून राहावे अशी परिस्थिती आता नाही.

पाळी दरम्यान क्रिकेट खेळायला मी येत नाही, माझं पोट दुखतंय, असे भावाला सांगितले तर तो म्हणतो, “पूर्वीच्या काळी राणींना पाळी आली म्हणून त्या काय युद्ध थांबवायच्या का? कुठे खांद्यावर मुलाला बांधून लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि कुठे पाळी आली म्हणून तेच चार दिवस धरून बसणारी तू! चल उठ तुला आज पहिली बॅटिंग देतो.” त्याच्या ह्या शब्दांमुळे माझ्यातला आत्मविश्वास वाढतो आणि मीच माझ्या अवतीभवती लादलेल्या चौकटी तोडून बाहेर पडू लागते.

कारण जेव्हा तिचे ‘ती’ असणे ती गृहीत धरू देत नाही तेव्हा या चौकटी बिथरू लागतात. तेव्हा हा समाज आतल्याआत मोठ्याने आरोळ्या मारत असतो पण, तिच्यापुढे किंचाळी मारायला घाबरतो. होय! घाबरतो. कारण, ती जेव्हा समाजाला घाबरत नाही तेव्हा हा समाज तिला घाबरतो. दाखवत नसला तरीही! तिला प्रत्येक पावलावर काहीतरी असतेच जे काट्यासारखे रुतत असते. छोटी दुखापत होते, काढता आले तर थोडे दुखते आणि नाहीच काढता आले तर, कुरूप होऊन तिथेच घर करते आणि मधून मधून धगधगत असते! ते कुरूप म्हणजे तिची आपलीच लोक असतात. कारण ती आपली असतात ना!

शेवटी ते धगधगण सहन करत ती स्वतःला सिद्ध करत असतेच. कधी ढासळते, चुकते, पडते, उभी राहते पण, चालत राहते. ती कितीही काहीही झाले तरी, थोडा स्वल्पविराम घेईल पण, तिच्या प्रश्नांना आणि जगण्याला पूर्णविराम देत नाही. कोणत्याही स्थितीवर रोखठोक प्रश्न उठवतांना तिच्यावरही प्रश्न उठतात. कारण, रचनात्मक व्यवस्थेवर प्रश्न उभे केल्यावर चारित्र्य नावाचा फालतू विनोद प्रश्न म्हणून नेहमीप्रमाणे तिच्यावर चिकटवला जातो ! पण, तरीही ती निरंतर चालतं राहते. अनेक ध्येय सोबत घेऊन. पण, एक ध्येय जे अटळ असते, तिच्या ‘स्वातंत्र्याच’! तीच ‘माणूस’ म्हणून जगण्याचं! त्यासाठी ती प्रत्येक क्षणी लढत असते… आणि ही लढाई अशीच चालू असते आयुष्यभर! समाजातला एक गट असा असतो की ज्याला तिचे स्वातंत्र्य नकोसे असते. ज्यांना तिला नेहमीच अंधश्रद्धेत, कर्मकांडात गुंतवून ठेवायचे असते. तिला वेळोवेळी त्या समाजाकडून संस्कृतीच्या परंपरेच्या नावाखाली समज दिली जाते की, “बाईच्या जातीने जास्त बोलायचे नसते!”

सामाजिक काम करणारी मैत्रीण चंचल ग्रामीण भागात सॅनिटरी पॅड वाटप करतानाचे तिचे अनुभव सांगते की, आजही स्त्रिया प्रश्न करतात, हे काय? बिस्कीटचा पुडा आहे का? म्हणजे आजही मासिक पाळीबद्दल जनजागृती नाही म्हणजेच तिच्या आरोग्याबद्दल जागृती नाही. तिला पाच दिवस वेगळं राहावं लागेल म्ह्णून खोट्या रूढी परंपरांच्या नादात डॉक्टरांचा सल्ला न घेता मासिक पाळी पुढे मागे होण्यासाठी गोळ्या घेतात. याने आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतात. तिचा स्पर्श चालत नाही म्हणून पाच दिवस तिला वाळीत, मानसिक बंधनात ठेवण्यापेक्षा त्या दिवसात तिला आरामाची गरज असते म्ह्णून “हे तर प्रत्येक महिन्याच!” असे न म्हणता तिला जपले, जसे बाकीचे दिवस ती सर्वांना जपत असते, तर….?

आणि स्त्रियांनी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, देवी ही सुद्धा एक स्त्रीच आहे. तिला मंदिरातून 1 ते 5 दिवस कधी बाजूला होताना पाहिले आहे का? प्रश्न साधा आहे. इथली मानसिकता सडकी आहे. ‘मासिक पाळी मानसिक पाळी झाली आहे’. तिच्या शारीरिक आरामासाठी तिने जास्त काम करू नये. याचे रूपांतर विटाळात झाले आहे. म्हणून इथल्या चुकीच्या गोष्टींना न जुमानता ह्या वेळेस स्त्रियांनी स्वतःचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपत स्व-स्वातंत्र्यासाठी लढलेच पाहिजे. या समाजव्यवस्थेला प्रश्न विचारलाच पाहिजे!

तिचा हा स्वातंत्र्य लढा तेव्हाच संपेल जेव्हा तळागाळातील प्रत्येक स्त्री तिच्या अधिकारांबद्दल, तिच्या मानसिक स्वातंत्र्याबद्दल निर्भीडपणे बोलेल, जेव्हा तीच्या प्रश्नांनी ती समाजाला फाट्यावर मारेल आणि जेव्हा गुलामगिरीच्या जोखडात बंदिस्त ठेऊ पाहणाऱ्या या समाजाच्या प्रत्येकाकडून समाधानकारक उत्तर मिळेल तेव्हाच हा स्वातंत्र्यलढा संपेल.

When_women_will_get_freedom?

Menstrual_cycle_or_mental_cycle?

स्वातंत्र्य दिन

आझादी_का_अमृत_महोत्सव

-छाया काविरे
9022535608

मी डूबत जातेय…!

ह्या दंगली, जाळपोळ, कुपोषण, बेरोजगारी सारख्या विषयांना हात न घालता भोंग्यांच्या नावाने पेटलेल हे राजकारण, हे आप-आपसात भांडणारे राज्यकर्ते आणि ह्या सभोवतालच्या व्यभिचारी नजरा ! सभोवताली हे सगळं घडत बघताना जिन्याच्या पायऱ्यांवरुन उतरतांना वेगळंच दडपण येत कसलं तरी मोठं ओझं पाठीवर ठेवल्यासारखं वाटत। ही गर्दी, गोंधळ, रोज ऐकायला येणाऱ्या बलात्काराच्या घटना हे नकोय…. नकोय…. नकोय म्हणत मी जोरात किंचाळतेय पण माझ्या शेजारच्यालाही माझं किंचाळण ऐकू येत नाही। मग मनात दाटून येते एक वेगळीच निराशा …. आणि  उदासीनतेच्या अंधकारात मी  खोल डूबत जाते… डुबत जाते आणि डूबतच जाते….!

उत्तम कांबळे

इ. 12 वीच्या वर्गात असतांना काहीतरी वाचायचंय म्हणून कॉलेजच्या लायब्ररीत पुस्तक शोधत असतांना “वाट तुडवितांना” हे पुस्तक हाती लागलं. त्या पुस्तकामुळे पत्रकारितेशी ओळख झाली आणि पुस्तकांशी मैत्रीही! त्या पुस्तकाच्या लेखकाची सर्वीच पुस्तक मी वाचायला घेतली आणि त्यांच्या प्रत्येक पुस्तकात रममाण होऊन पहिल्याच बैठकीत पुस्तक संपवायची स्वतःशीच स्पर्धा सुरू व्हायची. त्यांची भन्नाट वाटणारी भाषणं, पुस्तकं, आणि अभ्यासू लिखाण वाचून मला त्यांच्या सारखच पत्रकार व्हायचंय ही माझी भूमिका ठाम व्हायची. मराठी साहित्यातल्या आवडत्या लेखकांपैकी एक लेखक म्हणजे सकाळ वृत्तपत्राचे माजी संपादक उत्तम कांबळे सर !

आज छात्रभारतीच्या शिबिरात त्यांच्याशी भेट झाली. “सध्या काय चाललंय तुझं?”, असा त्यांनी सवाल केला आणि सुरू झाला संवाद पत्रकारितेबद्दल!

यावेळी संविधानाची फ्रेम देत त्यांनी पत्रकारितेतील करिअर बद्दल शुभेच्छा दिल्या आणि “संविधानावर अभ्यास कर, पत्रकाराच्या जीवनात संविधानाच्या तत्वांची मोठी भूमिका असते. तुझ्या वेळेनुसार मला संविधानाचा अर्थ येऊन सांग!” अशी सूचना त्यांनी दिली.

उमेश देवगिरीकर

यापेक्षा अजून वेगळं काय हवं माणसाला! आपल्या कामाची दखल घेतली जातेय हीच एका कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. तुमच्या शब्दांनी मी भारावून गेलीय. तुमच्या सारखीच लोक आणि त्यांची माझ्या प्रतीची काळजी मला काम करायला नेहमीच प्रेरित करीत असतात. तुमच्या माझ्यासाठीच्या लिखाणाने नक्कीच माझी जबाबदारी अजून वाढली आहे. कितीही संकट आली तरी मी नेहमीच तटस्थ राहून लढण्याचा प्रयत्न करतेय आणि पुढे ही करत राहील!

खूप खूप धन्यवाद सर!


प्रिय छाया,

जिद्द, धाडसी निर्णय, कला कौशल्य , यश अपयश, कणखरपणा, चिकाटी, नेतृत्व, आणि खुप काही ….. समजत नाही तु जे काही करते आहेस ते स्वतः साठी करतेस की समाजासाठी….. पण जे काही करतेस ना खुप अनमोल आहे अगनीत आहे. तुझ ध्येय मला नाही माहिती पण तुझा रस्ता ज्या दिशेला  आहे ना तो खुप कठोर आहे असामान्य रंगाने आणि अनेक खाच खळगी भरून तुझ्या समोर आहे. खुप सावध राहायला हव  प्रत्येक पाउल विचार करून टाक  , कारण  काळजी वाटते मैत्री आहे म्हणून, काळजी वाटते मुलगी आहेस म्हणून . थोडा वेळ मनात काहुर ऊभ राहील.  पुढे लिहिण्यासाठी शब्द सुचेना……..पण तु धाडसी आहेस हुशार आहेस, नेतृत्व करण्यास आणि परीस्थीती शी दोन हात करण्याची ताकद आहे तुझ्यात, मगाशी मी म्हणालो मैत्री आहे, पण विचार केला कीती वेळा आपण भेटलो….. काही २ ते ३ तास  आणि आपल बोलण कीती झाले तर अगदी खुप कमी.. एवढय़ा कमी वेळेत एखाद्या व्यक्तीला अोळखणं तस कठीण… पण तुझ काम जिद्द यावरून आज समजल की तु असामान्य आहेस, माझ भाग्य आहे अशी व्यक्तीशी माझ मैत्री च नात आहे, आणि ते कायम राहील. आपले रस्ते वेगळे असू शकतात। पण गर्व नेहमी राहील.
मगाशी मी म्हणालो काळजी वाटते………. हो वाटते… वाटतही राहील…. हे जग तुला सहज कोणतेही काम पूर्णतः ला नेण्यासाठी समर्थ असणार नाही, तुझ्या वाटेत काटे पेरणीसाठी खुप बसलेत, पण तेच काटे बाजुला करणारे भेटतील च असे नाही.

सगळीकडे कपट कारस्थान करणारे बसलेत तशी खुप उदाहरणे तुझ्या समोर आहेत, माहीत आहेतच……… म्हणून. आज छात्रभारती शिबीरात मा. उत्तम कांबळे सरांनी तुला जी सुचना दिली त्या वरून तुझ्याशी बोलावे वाटल. भारतीय संविधान-  डॉ . बाबासाहेब आंबेडकर अनमोल रत्न परंतु आज देशात खुप बिकट परिस्थितीत आहे, संविधान हटवून मनुस्मृति लादण्याचा नीच प्रयत्न काही नीच वृत्तींकडुन केला जातोय, उघडया डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा काही तळवे चाटू लोकांनी देश गुलामगिरीत लोटून दिला आणि त्यातच देश प्रेम मानत आहेत,
पाटीभर असणाऱ्यांनी मात्र मुठ भर असणाऱ्यांची गुलामीत च सर्वस्व पाहील खुप चिड येते, तु असामान्य आहेस खुप पुढे जा आम्ही तुझ्या बरोबर आहोत काळजी घे.

तुला आणि तुझ्या कार्याला सलाम व खुप खुप शुभेच्छा

-उमेश देवगिरीकर
संभाजी ब्रिगेड पुणे

LGBT

LGBT समुदायाबद्दल जाणून घ्यायचं कुतूहल मला नेहमीच होत!
पुण्यात पाहिल्यांदा तुळशी बागेत फिरत असतांना मी चुकून बुधवार पेठेत शिरली आणि तिथे कॉर्नर ला एक छोट्याशा स्टॉल मध्ये चिकन लॉलीपॉप तळताना बघून तिथेच खायला बसली. ऑर्डर दिली आणि आजू बाजूला बघितलं तर तो एरिया माझ्या लक्षात आला. तिथल्या काही व्याभिचारी नजरा मला टवकारून बघत होत्या. तिथून पटकन निघावं अस डोक्यात आलं आणि मी उठू लागली तेव्हा समोरच्या खुर्चीवर बसलेली एक ट्रान्सजेंडर माझी पळकी अवस्था बघून म्हणाली, खाली बस घाबरू नको, खाऊन जा! मला अजून aukward वाटू नये म्ह्णून तिचा ग्लास तिने side ला ठेवला आणि इतर पुरुषांना काही वेळ तिने आत येऊ दिले नाही आणि माझे ट्रान्सजेंडर विषयीचे एकतर्फी दृष्टिकोन बदलत गेले.

आणि आज दिशा पिंकी शेख, ज्या महाराष्ट्रातील ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या प्रवक्ते गटाच्या सदस्याही आहेत. त्यांची सर्वत्र ओळख सामाजिक चळवळीतील एक ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या आणि कवयित्री म्हणून केली जाते, यांच्याशी छात्रभारतीच्या शिबिरात भेट झाली.

मुलींवरच्या बलात्काराला 7 वर्षे शिक्षा आणि ट्रान्सजेंडरच्या बलात्काराला शिक्षा फक्त 3 वर्षे ? सेक्स वर्कर महिलांच्या बलात्काराला आपण बलात्कार मानतो का ? बाई-बाई ची शत्रू नसते त्यांच्यात insecurity असल्यामुळे वाद होतात. खरतर बायका पुरुषांच्या दृष्टीकोनात चांगली बाई होण्यासाठी धडपडत असतात. हसत खेळत गर्भवती बाईच्या पुढे हाताची तर्जनी आणि मध्यमा ही दोन बोट नेत आपण विचारतो, पाहू तुला काय होईल, मुलगा की मुलगी ? पण आपण कधी तीन बोट पुढे केलीयेत का ? मुलगा किंवा मुलगी झाली तर आनंद होतो पण Intersexual child झालं तर बिघडतंय का ? घरात काम करणं म्हणजे मदत करणं नाही ती आपली जबाबदारी असते. भस्मासुर ला वरदान होत कि तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होईल आणि शेवटी तो स्वतःच्या डोक्यावर हाथ ठेवतो आणि भस्म होतो. मग माझं हात तुमच्या डोक्यावर ठेवल्याने तुमचं कल्याण होणार असेल तर माझा हाथ माझ्याच डोक्यावर ठेवल्याने माझा कल्याण का होत नाही ? अस दिशा ताई यावेळी म्हणाल्या.

आज तुला अशा कित्येक विषयांवर, संविधानावर, जाती-धर्मावर, स्त्री-पुरुष समानतेवर, तुझ्या अधिकारांबद्दल बोलतांना आणि एक जागृत ट्रान्सजेंडर सोबत संवाद साधतांना भारी वाटलं.

-छाया काविरे.

तेव्हा ह्या चौकटी बिथरू लागतात…

जेव्हा तिचं ‘ती’ असणं ती गृहीत धरू देत नाही तेव्हा ह्या चौकटी बिथरू लागतात. आतल्याआत मोठ्याने आरोळ्या ठोकत असतात पण तिच्यापुढे किंचाळी मारायला घाबरतात. होय! घाबरतात. कारण, ती जेव्हा समाजाला घाबरत नाही तेव्हा समाज तिला घाबरतो. दाखवत नसला तरीही! तिला प्रत्येक पाऊलावर काहीतरी असतंच जे काट्यासारखं रुतत असतं. छोटी दुखापत होते, काढता आला तर थोड दुखत आणि नाहीच काढता आला तर कुरूप होऊन तिथंच घर करत आणि मधून मधून धगधगत असतं! ते कुरूप तिची आपलीच लोक असतात. कारण ती आपली असतात ना!

शेवटी ते धगधगण सहन करत ती स्वतःला सिद्ध करत असतेच. कधी ढासळते, चुकते, पडते, उभी राहते, चालत राहते पण, ही अशी ना की कितीही काहीही झालं तर थोडा स्वल्पविराम घेईल पण जगण्याला पूर्णविराम घेत नाही. कोणत्या स्थितीवर रोखठोक प्रश्न उठवते तेव्हा तिच्यावरही प्रश्न उठतात. कारण, रचनात्मक व्यवस्थेवर प्रश्न उभे केल्यावर चारित्र्य नावाचा फालतू विनोद प्रश्न म्हणून तिच्यावर चिकटवला जातो हे दिसतच! पण तरीही ती निरंतर चालतं राहते अनेक ध्येय सोबत घेऊन पण एक ध्येय जे अटळ असतं, तीच ‘माणूस’ म्हणून जगण्याचं! त्यासाठी ती प्रत्येक क्षणी लढत असते… आणि ही लढाई अशीच चालू असते आयुष्यभर!

सह्याद्री ते सातपुडा…!

काहीही फारस बदललेलं नव्हतं !

आज बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर एका लग्नानिमित्ताने
सह्याद्री ते सातपुडा असा प्रवास झाला. लग्नाच्या आदल्या दिवशी अहेर चा कार्यक्रम झाला. अगदी “घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा.” या म्हणीप्रमाणेच !

लग्नाची वेळ दुपारी 12 ची ठरली होती पण नेहमीप्रमाणेच लग्न मंगलाष्टक आणि ढोल ताशांच्या गजरात सायंकाळी 4 वाजता लागले  आणि जेवायच्या पंगती बसल्या. जेवतांना एक बाई एका माणसाला बोलत होती की, “मी हलक्या समाजाची आहे म्हणत त्यांनी मला निमंत्रण दिले नाही, तरी माझ्या आप्पाने (वडिलांनी) मला जात लपवायला आधीच सांगितलेले होते”. खरंतर यावर अवाक होण्यासारख मला काहीही वाटलं नाही. कारण हे सर्व काही नवीन नव्हतच. तिला मी पुढे काहीतरी विचारणार त्या आधीच एक वेगळाच गोंधळ उडाला. दोन तृतीयपंथी पैसे मागण्यासाठी स्टेज वर चढल्यामुळे हा गोंधळ उडाला होता. ते स्टेज वर चढले म्ह्णून खालून टल्ली झालेला एक काका त्याला शिव्या घालत होता. ”स्टेज वर चढले म्ह्णून काय झालं ती माणसं नाहीत का?” असा प्रश्न मी त्याला विचारला पण तो काहीही उत्तरला नाही. त्याची बोलायची पद्धत नक्कीच चुकीची होती.  तृतीयपंथी 10,000 रुपयांचा हट्ट धरून बसली होती. तेवढ्यात एक समजूत घालणारी बाई म्हणाली, “त्यांना शिव्या घालू नका नाहीतर ते श्राप देतील”. खूप गदारोळानंतर वातावरण शांत झालं आणि उघडी-नागडी कुपोषित दिसणारी पोरं ‘ढसकण’ (पंगतीच्या ताटातील दहा पदार्थ मिक्स करून बनवलेला खाद्य प्रकार) खात बसली. आम्ही मूळ गावी म्हणजेच चोपड्याला आलो. गावात एक वेगळीच निराशा जाणवत होती, गाव फार उदास वाटत होतं.

काहीही फारस बदललेलं नव्हतं, रस्त्यावरून चालतांना खड्डे बघून “आपण इयत्ता 5 वीच्या वर्गात असतांना सायकलवरून शाळेत जातांना ह्याच खड्यात पडलो होतो” याची आठवण झाली. सोन्याची धूळ उडणाऱ्या देशात प्रदूषणाची धूळ उडत बघतांना आठवलं की, काही दिवसांपूर्वीच वक्तृत्व स्पर्धेतील एका मित्राला मी म्हणाली होती की, तू जळगाव जिल्ह्यातील ही स्पर्धा का करत नाही ? तर त्याच उत्तर होत, ”तिकडे फार धूळ असते एकदा स्पर्धेनिमित्त तिकडे जायचं म्हणजे परत येऊन दोन दिवस आजारी पडायचं ठरलेलं असत आणि मग दुसऱ्या स्पर्धेला खाडा पडतो म्हणून नकोच वाटत जायला”.

सगळं अगदी तसंच तर होत, वर्षानुवर्षे तशीच असलेली खड्डे, तापी काठी आणि सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या कधी काळी सुजलाम- सुफलाम वाटणाऱ्या आमच्या गावात आजही भर उन्हाळ्यात महिन्यात 15 दिवसांनी एकदाच पाणी येते, सातपुडा कोरडा पडलाय, गाव ओसाड झालीयेत,  महाविद्यालयातुन पास-आउट झालेल्या बेरोजगार पोरांचा एक लॉट clg च्या कट्ट्यावर पडून असतो, उरलेला तरुण वर्ग मागील काही वर्षात शिक्षण आणि रोजगारासाठी सुरत आणि मुंबईला स्थलांतरित झालाय. मागील काही महिन्यांपासून पुण्यात नद्यांच्या समृद्धीकरणाचे जागोजागी फ्लेक्स लावलेत (नद्यांमधली जलपर्णी ही अजून काढली गेलेली नाहीये तो भाग वेगळाच) पण इकडेही नद्यांचे नाले झालेत. सुलभ शौचालयांची अवस्था बघून त्या “सुलभ” शब्दावर काळा रंग फेकुन मारावं असं वाटत होतं. पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ अभियानात घरोघरी शौचालय उभारली गेली तर आहेत पण, पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नाही म्हणून लोक शौचास उघड्यावर जाण्याला पसंती देतात.

सगळं अगदी तसच तर आहे, शिकून काहितरि  मोठं करायचंय या भावनेतून शिकणाऱ्या मुली कमी, पण चांगलं स्थळ येत नाही म्हणून शिकावं म्ह्णून पर्यायाअभावी  Msc chemistry, biology , technology शिकलेल्या  कितीतरी मुली आज ही आठवड्यात एकदा तरी महादेवाचा उपवास करतात, ‘सुनेला 3 मुलीनंतर तरी चौथा मुलगा होउदे’ म्हणून बायका नवस करतात किंवा महाराष्ट्रात स्त्री गर्भपाताला बंधी असल्यामुळे सुरतला (गुजरात) जाऊन चाचणी करतात. बाजारात जातांना रस्त्यात कॉलेजचा ज्युनिअर विद्यार्थी भेटला तो आधीपासूनच फार होतकरू होता.  महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यापासून तो स्वतःचा शैक्षणिक खर्च स्वतःच करीत होता . अचानक भेटलेल्या ह्या भेटीत तो त्याच्या संघर्षाबद्दल बोलत होता. बोलताना, “चांगलं व्हयन तुम्ही गाव माई बाहेर पडीसन शिकाले गयात” अस सांगत होता. “इकडे रोजगार नाही पण, मी आता एका कपड्याच्या दुकानात कामाला आहे. दुकानात ग्राहक नसल्यावर मला मिळालेल्या वेळेत मी अभ्यास करतो. मला पुढे माझा व्यवसाय करायचाय”, असं तो सांगत होता.

सगळं अगदी तसच तर आहे,  या दुःखी भावनेने घरी परतत असतांना महार, मांग आणि चांभारवाड्याला जोडणाऱ्या एका चौकात संविधान चौकाचा मस्त लायटिंगने सजवलेला एक फलक पाहिला आणि बरं वाटलं. आणि राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भाषातज्ञ डॉ. गणेश देवींनी सुरू केलेल्या उपक्रमाची आठवण झाली. पण थोड्याच कालावधीत त्याच जागी तो चौक का उभारलाय? हे ऐकून आपली गावे अविकसित का? या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि परत निराशा दाटून आली.

सगळं अगदी तसच तर आहे, आजीच्या हाताच्या खमंग पुरणपोळीचा सुगंध आजही अगदी तसाच आहे, मांगवाड्यात दारू पिऊन पडलेल्या बापाजवळ रडत बसलेला कुपोषित लेकरू ही तसाच आहे, पाण्यासाठी सरकारी टँकर वर हांडा-कळशी घेऊन भांडणाऱ्या गल्लीतल्या काकूंची अवस्थाही तशीच आहे, रस्त्यावरची खड्डे आणि उडणारी कोरडी धूळ तशीच आहे, शेतीव्यतिरिक्त इतर कौशल्य असूनही रोजगार नाही म्हणून हताश होऊन नांगर घेऊन वावराच्या दिशेने निघालेला तरुण वर्ग देखील तसाच आहे.

आणि सगळं अगदी तसच तर आहे म्हणून हे सगळं मी ही तसंच ठेऊन परतीच्या प्रवासाला लागली आणि सातपुडा ते सह्याद्री प्रवास परत सुरु झाला. पण सगळं तसंच ठेऊन परतीच्या प्रवासाला निघाली खरी पण मनात उडालेल ते प्रश्नाचं वादळ कधी थांबणार ? प्रत्येक वेळेस समाजाकडे बोट दाखवणारे आपण फक्त समाज हीताच लिहीतोय आणि लिहून मोकळ होतोय..एवढच समाधान! हे आजुबाजूला घडत असलेल पाहील की राग येतो आपणाला हे खरयं.. पण ज्यांना याच काहीच घेणं- देणं नाही, ज्यांना त्या भावना ही नाहीत त्यांच्यापेक्षा जास्तीचे दोषी आपण आहोत कारण आपणाला हे समजतय तरीही आपण मठ्ठ आहोत. समाज व्यवस्थेला जाब विचारणारी एक भक्कम फळी आपणाला निर्माण करावी लागेल. आणि मगच पूढच्या वेळेसचा सह्याद्री ते सातपुडा प्रवास एका बदलाची अपेक्षा घेऊन येईल…हीच ईच्छा !

-छाया काविरे

कधी आम्ही निर्धास्त जगू?

रात्री 10. 30 वाजता प्रवास करतांना निर्भयाची घटना सारखी आठवत होती…  फरक इतकाच होता की ती private बस मध्ये बसली होती आणि मी pmt बस मध्ये..पण आजूबाजूला नजरा मात्र त्याच होत्या व्याभिचारी ।

(आता काही पुरुष अर्थात स्त्रियाही म्हणतील एवढया रात्री बाहेर जायची काय गरज आहे त्यांच्यासाठी टीप- तुम्हाला तुमच स्वातंत्र्य जितकं प्रिय आहे तितकंच मलाही!)

– छाया काविरे.

#WomenSafetyAwareness
#women
#india

माझा बाप लय मोठा माणूस हाय!

बापमाणूस

मी कधीच तुला आदरार्थी शब्दाने हाक मारली नाही.
तू नेहमीच माझा चांगला मित्र बनून राहिलास आणि आरशासारखं मला माझं प्रतिबिंब दाखवत गेलास. आपल्यातल्या वैचारिक कलहंमध्येही तू नेहमीच माझी बाजू मला ठामपणे मांडू दिलीस. मला नेहमी वाटायचं कि मी तूझ्या आणि आई एवढी सुंदर का नाहीये? तेव्हा तू उपहासाने म्हणायचा, तू आमच्या सारखी दिसायला आमची आहेसच नाही, तु तर आम्हाला चोपड्याच्या (जिल्हा-जळगाव)रत्नावती नदीच्या पुलाखाली सापडली होती पण तू ना एखाद्या मोठ्या पुढाऱ्याची , एखाद्या मोठ्या माणसाची मुलगी असशील. कारण तुझ्या इतकं धाडस नाहिये आमच्यात!
अजूनही कॉलेज चा इयत्ता 12 वी चा तो दिवस आठवतो… आजी मला म्हणत होती ओढणी नीट घेत जा, येतांना रस्त्यावर पोरींसोबत दात काढत जाऊ नको, वर्गात सरांच्याही नजरेस नजर भिडवत जाऊ नको, “माणूस नि जातं गयरीं वाईट ऱ्हास माय!” तेव्हा तू आजीला म्हणाला होतास, ‘ती नजरेला नजर भिडवून बोलते म्हणून तर वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवते’.

आणि माझी भोळी भाबळी आजी म्हणायची काय करणार त्या लाकडी-लोखंडी बक्षिसाच त्यापेक्षा तुझ्या कॉलेजवाल्यांना सांग तांबे-पितळेची भांडी देत जा लग्नानंतर पण कामी येतील. मला माहित नाही माझा हा प्रवास मला कुठपर्यंत नेऊन थांबवेल, पण तुझ्या पाठिंब्याशिवाय मी काहीही नाही. गावाकडे बापाच्या धाकान बापाला येतांना बघून खेळता खेळता पोरी घरात पळून जायच्या, पण तुझ्या पाठिंब्यामुळे मी टेबल टेनिस च्या राज्यस्तरीय मॅचेस पर्यंत जाऊ शकली. B.A. च्या शेवटच्या वर्षाला असतांना मला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर चा अवॉर्ड मिळाला हे सगळं तुझ्या पाठिंब्यामुळेच ! हरियाणा ला राज्यस्तरीय पिकल बॉल स्पर्धेसाठी मी पात्र असूनही डावलली जात असतांना तू किती किती लढलास माझ्यासाठी…. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आपल्या गावातील उत्तमोत्तम शाळेत मला शिक्षण मिळाव आणि धर्म-जात, रूढी-परंपरेच्या या विषमतेच्या घोड्याच्या टापाखाली भरडल्या, रगडल्या, चिरडल्या जाणाऱ्या  समाजासाठी मी ढाल बनण्याचं तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. “आपल्याला दूरचा पल्ला गाठायचा आहे थांबु नको लढत रहा.. कोणी पाडण्याचा प्रयत्न केला तर दुपटीच्या ताकतीने ताठ उभी रहा ” तुझे हे शब्द जेव्हा जेव्हा मी खचते, नकारात्मक होते तेव्हा तेव्हा मला आठवतात.
        अनेक आर्थिक अडचणी आल्यावरही  तू आमचं तिघ भावंडांच शिक्षण कधी थांबू दिल नाहीस. तुझा संघर्ष अतुलनीय आहे. थोडा ही पाय डगमगु लागला, मन खचू लागलं की फुटपाथवर भाजी विकत बसलेला तू आणि माझी मोलकरीण आई डोळ्यांसमोर उभी राहते. शिक्षणासाठी तुझ्या असलेल्या याच धडपडीमुळे  महार, मांग आणि चांभारवाड्यातली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली गेलेली मुले पुन्हा प्रवाहात येऊ शकली.

               तुझ्या वर बोलावं तितकं कमीच आहे पण तुझ्या सारखा बाप प्रत्येक मुलीला भेटला तर कोणतीही मुलगी शिक्षित झाल्या बिगर राहणार नाही याची खात्री आहे.

परत एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछा….

-छाया काविरे.